नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी बुधवारी 'संघ गंगा के तीन भगिरथ' या नाटकाचे उद्घाटन केले. संघाने गंगेच्या प्रवाहाप्रमाणे समाजात आपला कार्यविस्तार केला असून, संघाचा प्रवाह थांबविणे कोणाच्याही सामर्थ्याला शक्य नाही, असे ते म्हणाले. या नाटकाचे उद्दिष्ट संघाचे तीन महत्त्वाचे सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, गोळवलकर गुरूजी आणि बाळासाहेब देवरस यांचे जीवन आणि कार्य दर्शविणे आहे.
'संघ गंगा के तीन भगिरथ' नाटकाच्या उद्घाटन सोहळ्यात विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सहसंघचालक व नाटकाचे लेखक श्रीधर गाडगे उपस्थित होते. भैय्याजी जोशी यांनी या नाटकाच्या माध्यमातून संघाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी गंगेच्या पवित्र प्रवाहाचा उल्लेख करत, संघाच्या कार्याबद्दल महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. रामायण, महाभारत यासारख्या ऐतिहासिक काव्यांना प्रमाण मानत, संघाच्या तीन भगिरथांचे कार्य साक्षात पाहिले आहे.
त्यांनी सांगितले की, संघाच्या कार्यविस्तारामुळे समाजात शुद्ध प्रवाह अविरतपणे चालत राहिला आहे आणि तो प्रवाह तोपर्यंत चालू राहील, जोपर्यंत समाजाला त्याची आवश्यकता आहे. यावेळी ज्येष्ठ प्रचारक रविंद्र भुसारी, दिलीप जाजू, निखील मुंडले, निलिमा बावणे, अरुणा पुरोहित यांनी देखील उपस्थिती दर्शवली.