राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील उद्योग व गुंतवणुकीच्या स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, राज्यातील फक्त सहा जिल्हे वगळता इतरत्र उद्योजक गुंतवणुकीस तयार नाहीत, कारण खंडणीखोरीला राजाश्रय मिळत असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परिणामी राज्यात रोजगारनिर्मितीवर गंभीर परिणाम झाला आहे.
चव्हाण यांच्या मते, उद्योगधंद्यात अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य सध्या मागे पडले असून, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांतूनच राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा येतो. अन्य जिल्ह्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने समतोल प्रगती होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खंडणीखोरी रोखण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच “लाडकी बहीण” योजनेच्या नावाखाली निधीचा अपव्यय होत असल्याने सरकार आर्थिक संकटात सापडले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
जातनिहाय जनगणनेबाबत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन करत मनमोहन सिंग सरकारच्या काळातच याची सुरुवात झाल्याचे सांगितले. तसेच जागतिक व्यापारातील भारताच्या सहभागावर भाष्य करताना त्यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली आणि भारत सरकारने विरोधकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली.