नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवर तणाव वाढला आहे. दोन्ही देशांची सैन्य दले पूर्णपणे अलर्टवर असून जम्मू-काश्मीरमधील एलओसीवर चकमकी सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसोबत आणीबाणी बैठक घेतली. या बैठकीत सैन्यदलांना संपूर्ण कारवाईचे अधिकार देण्यात आल्याची माहिती आहे.
सीमारेषेवरच्या परिस्थितीत उतारचढाव झाल्याने पाकिस्तानी सैन्याने काही चौक्या रिकाम्या केल्याचे पाहिले गेले आहे. नौशेरा, सुंदरबनी, अखनूर, बारामूला आणि कुपवाडा या सीमावर्ती भागात जोरदार गोळीबार चालू असून भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानी सैनिकांनी स्वतःच्या काही चौक्यांवरील झेंडे खाली उतरवल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. सध्या सीमेवरील प्रत्येक हालचालीवर भारतीय सुरक्षा दलांचे कडेकोट लक्ष आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने इस्लामाबाद आणि लाहोर येथे 2 मे पर्यंत 'नो फ्लाय झोन' जाहीर केला आहे. याचा अर्थ या प्रदेशातून कोणतीही हवाई वाहतूक होणार नाही. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, भारताकडून एअर स्ट्राईकची शक्यता पाकिस्तानला भीती वाटत असल्याचे हे लक्षण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध पाच मोठे निर्णय घेतले असून सीमा सुरक्षेसाठी संपूर्ण तयारी केली आहे.